अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत करा   

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई : मे महिन्यात राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या  अवकाळी पावसामुळे  शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजप युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. राज्य सरकारने तातडीने शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत दकरावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
 
शेतकर्‍यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळणारी एक  रुपयात पीक विमा योजना सरकारने बंद करून शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. पीक कापणीवर आधारीत नवी विमा योजना शेतकर्‍यांच्या हिताची नाही. पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही. या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून पुन्हा  १ रुपयात पीक विमा योजना राबवावी,  अशी मागणी  सपकाळ यांनी केली.
 
यावेळी सपकाळ यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीवरून सरकारवर टीका केली. राज्यात खरीप   हंगामाची लगबग सुरु झाली आहे. बी-बियाणे, खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे.  पण सरकारच्या कृषी विभागाची काहीच तयारी दिसत नाही. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकर्‍यांची  फसवणूक करत आहेत. राज्यभर बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे.  दरवर्षीप्रमाणे खते बियाणे लिंकिंग करून व्यापारी शेतकर्‍यांची अडवणूक करत आहेत. सरकार फक्त कारवाईच्या घोषणा करते,  पण कारवाई काही करत नाही. त्यामुळे आतातरी सरकारने जागे व्हावे आणि  लिंकिंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, असे  सपकाळ म्हणाले.
 

Related Articles